Monday 22 August 2016

Akshay Kumar and Hrithik Roshan Club


अक्षय कुमार आणि हृतिक रोशन क्लब

-    हर्षदा वेदपाठक

बॉक्स ऑफीसवर दोन मोठया कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले तर त्यांच्या कामाची होणारी तुलना आणि बॉक्स ऑफीसवर जमा होणारे पै-पैसे यांची देखिल तुलना होणारच...हे गृहीत धरायला पाहिजे. मात्र त्या दोन चित्रपटांमधिल कन्टेन्डचे काय यावर फारसा कोणी विचार करताना, लिहीताना दिसत नाही...

रुस्तम हा नवदिग्दर्शक टिनु देसाई याचा पहिलाच चित्रपट. ज्यामध्ये मुंबईत घडलेल्या नानावटी खुन प्रकरणाचा आधार घेत तयार केलेले कथानक होते. अक्षय कुमार वगळता या चित्रपटात इतर कलाकार हे दुय्यमच होतेत. चित्रपटाचे एकंदरीत बजेट हे पासष्ट करोड होते. गुढ कथानकाला, रंजक तरीही धिम्या पध्दतीनं रुस्तममध्ये सादर केले गेलय, त्यातही प्रेक्षक चलबिचल होतोच. कथानक माहित असुनही,प्रेक्षक चित्रपटागृहात गेलेत ते चित्रपटाची मांडणी आकर्षक वाटल्यानं. रुस्तमचे संगीत श्रवणीय नाही जे चित्रपटाची जमा बाजु ठरु शकेल.

तर दुसरीकडे, भारतीय संस्कृतीचा जन्म ज्या मोहांजोदडो येथुन झाला, तेथील जिवनशैली आणि त्याचे नामशेष होणं हे दाखवण्याचा प्रयत्न, आशुतोष गोवारीकर यांनी मोहांजो दरो या चित्रपटाद्वारे केलाय. ऐतिहासिक कथा पडदयावर दाखवताना त्यात डॉक्युमेन्टेशन टाळुन, रटाऴपणा येणार नाही याची काळजी घेण्यास मात्र ते विसरले आहेत. हा संथपणा आटोपशीर पटकथेच्या मदतीनं देखिल टाळता आला असता. सोबत जुना काळ दाखवण्यासाठी व्ही.एफ.एक्स. आणि ग्राफीक्सचा केलेला वापर कथेला बऴ देण्याऐवजी, पटकथेला कमकुवत करतात. हृतिक रोशन हा प्रमुख कलाकार आपली भुमिका चोख बजावतो, मात्र कमकुवत पटकथेसमोर त्याचा अभिनय हतबल ठरतो. तर नवकलाकार पुजा हेगडे आपली नोंद घेण्यास भाग पाडते. संगीनी...हे गीत वगळता ऐ. आर. रहमान यांचे संगीत ठसा उमटवण्यास असमर्थ ठरते. तरी देखिल इतिहासाला भेट देण्यासाठी मोहांजो दरो पहायलाच हवा अशी कलाकृती आहे.

हृतिकच्या चित्रपटाने जेथे पहिल्या चार दिवसात चाळीस करोड कमावले तेथे अक्षयच्या चित्रपटाने सत्तर करोडच्या आसपास व्यावसाय करुन सगळेच रेकॉर्ड तोडलेत. आज या दोन्ही चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक आठवड्यापेक्षा अधिकचा कालावधी होत आहे. तेथे, रुस्तमने शंभर करोडचा आकडा पार केला तर आश्चर्य मानायला नको. इतकच नव्हे तर अक्षयच्या, रावडी राठोड या चित्रपटाने सगळ्यात अधिक कमाई (अक्षयच्या कारकीर्दीचा विचार करता)केली होती, तो रेकॉर्ड देखिल हा चित्रपट तोडेल असे एकंदरीत दिसुन येते आहे.

आतापर्यत अक्षय कुमारच्या पाच चित्रपटांनी शंभर करोडच्या पुढील कमाई केली आहे. सलमान, शाहरुख आणि आमिर खानचे चित्रपट जेथे दोनशे, तिनशे, चारशे आणि पाचशे करोड कमावतात. तसे भाग्य अक्षयच्या कोणत्याही चित्रपटाला प्राप्त झालेलं नाही. आणि त्याचा त्याला खेद देखिल नाही. रुस्तमच्या प्रदर्शन पुर्व दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षय सांगतो, मी वर्षभरात चार चित्रपट स्विकारतो. त्या प्रत्येकाचे बजेट हे तिस ते पस्तीस करोडच्या आसपास असते. आणि माझे सगळे चित्रपट वर्षभरात त्यांच्या गुंतवणुकीच्या काही पट जमा करतात. याच गणिताच्या आधारे, पाच वेळा शंभर करोडचा आकडा गाठणारा तो ऐकमेव कलाकार असावा. आतापर्यत सगळ्यात जास्त कमाई करणारया त्याच्या चित्रपटांत, रावडी राठोड या चित्रपटाचा समावेश आहे. आणि तो आकडा 133.25 करोड रुपयांचा आहे. रुस्तमपुर्व प्रदर्शित झालेल्या ऐअरलिफ्ट आणि हाऊसफुल तिन या चित्रपटाने या वर्षी शंभर करोडचा आकडा पार केलाय. त्यामुळे, शंभऱ करोड क्लबमध्ये नाव कमावणारा, रुस्तम हा त्याचा सहावा चित्रपट ठरणार आहे.

पुन्हा एकवार रुस्तमकडे वळता, या चित्रपटाने जेथे पहिल्या (स्वातंत्र्य दिनाच्या) विकऐन्डमध्ये सर्वाधित कमाई केलीय तेथे प्रेक्षकांच्या पसंतीसोबतच या चित्रपटाला परिक्षकांनी काही प्रमाणात पसंद केलं आहे. तेथे हृतिकचा चित्रपट परिक्षकांची स्तुती आणि बॉक्स ऑफीस या दोन्हीमध्ये मागे पडला. दोनशे करोड क्लबचा (क्रीश या चित्रपटाद्वारे) सदस्य असलेल्या हृतिकला, मोहांजो दारोद्वारे शंभऱ करोडच्या जवळपास पोहचणे देखिल कठीण होऊन बसणार आहे. 65 करोडमध्ये तयार झालेला रुस्तम आणि त्या समोर 140 करोडमध्ये तयार झालेला मोहांजो दारो, खुप नुकसानीमध्ये जाणार असं चित्र दिसतय. त्यामागे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि, निर्माता सिध्दार्थ रॉय कपुर यांचा रुसवाफुगवा असल्याची चर्चा सुरु आहे. निर्मात्यांनी सुचवलेले अनेक बदल, स्विकारण्यास गोवारीकर यांनी दिलेला नकार हे त्या रुसव्याफुगव्याचे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे. मोहांजो दारोची लांबी पाहता, त्यातील अनावश्यक दृष्य काढुन टाकायला अजुनही वाव आहे. तसेच गंभीर दृष्यात हसु आणणारी, ग्राफीक दृष्ये रिपेअर केल्यास चित्रपटाला फायदा होऊ शकतो. मात्र त्यासाठी देखिल, परत खर्च हा आहेच...एकतर चित्रपट तोट्यात असताना तो खर्च कोणी उचलायचा हा देखिल एक मोठा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाची प्रसिध्दी देखिल फार अशी झालेली नाही. त्यामागे, निर्मात्यांनी घेतलेला आखडता हात हे एक कारण पुढे येत असताना, दुसरीकडे हृतिकने, मिडीयापासुन तोंड फिरवल्याचे दिसुन येते. आणि त्यामागे, मिडीया त्याला, त्याचा सुझान बरोबरील घटस्फोट या प्रश्नासह, त्याची आणि कंगनाची असलेली कोर्ट केस या घटनांवर नक्कीच प्रश्न विचारणार हे समजुन त्याने अऩेक मुलाखतीच दिल्या नाहीत असं म्हटले जातं.

एक चित्रपट करायचा झाला तर त्यासाठी खुप परिश्रम करावे लागतात. त्यामुळे अऩेकांनी जेथे मोहांजो दारोवर टिका केली. ते, अऩेक अर्थहिन चित्रपट चालल्याचे दाखले का बरं विसरत आहेत. रक्षाबंधनच्या लॉंग विकऐन्डनंतर मोहांजो दारो या चित्रपट माऊथ पब्लिसिटीद्वारे लोकांचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर त्यानंतर चमत्कार घडेल हि आशा व्यक्त करायला हरकत नाही.

टिप - आगामी काही महिन्यांमध्ये, शिवाय आणि ऐ दिल है मुश्कील, गोलमाल 4 आणि आंखे 2, रईस आणि काबिल या चित्रपटांची टक्कर पाहता येईल.


No comments:

Post a Comment