Thursday 26 September 2019

Mohan Singh is no more


मोहन सिंग तू दुर्दैवी होतास !

५० वर्षे चित्रपट वितरणाच्या क्षेत्रात काम करून अतिशय सर्वसामान्य मृत्यू तुझ्या वाट्याला आला. आपल्या वयातही जवळपास ५० वर्षांचे अंतर आहे, पण गमतीदार क्षणांमध्ये तुला 'तू' संबोधण्याचा जो मी आनंद घेतला आहे, त्याचे साक्षीदारही आपणच आहोत. तुझ्या कामाचा आलेख बघता तुझ्या अंत्यसंस्काराला हिंदी चित्रपटसृष्टीतील चार दोन जुने कलावंत, निर्माते, वितरक तरी येतील, असे मला कायम वाटायचे. पण व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर तुझ्या वाट्याला आलेले दुर्दैव, या वैभवाची प्रचिती देणार नाही, याची जाणीव तुला होती. आणि काल तेच झाले.

अमिताभ बच्चन यांना नागपूरच्या सीताबर्डीची ओळख करून देणारा आणि रेल्वेच्या टीसीला "हरिवंशराय बच्चन का लडका है, कल स्टार बनेगा. ख्याल रखना", असे सांगणारा तूच तो मोहनसिंग अरोरा. दारासिंग नागपुरात आले की हॉटेलमधून थिएटरच्या मॅनेजरला फोन करून सांगायचे "सरदार को जरूर भेजना". मग तुम्ही सोबत जेवायला जायचे. देव आनंद नागपुरात येण्यापूर्वी विजय आनंद तुला फोन करून सांगायचे "देव आ रहा है, उसका सब इंतजाम करना" आणि मग तू देव आनंदचा नागपूरचा "गाईड" व्हायचास. प्रेम चोप्रा "टाईम्स अॉफ इंडिया"साठी वितरण वसुली एजंट म्हणून काम करायचे, तेव्हा नागपूर, गोंदिया आणि अमरावतीला वसुलीसाठी यायचे, हे तूच ठामपणे सांगितले होते. खुद्द प्रेम चोप्रांनी ते कबुल केले. धर्मेंद्र, जितेंद्र, बलराज साहनी, बडजात्या कुटुंब, खय्याम अशी कितीतरी नावे घेता येतील, ज्यांचा केवळ चित्रपटाच्या प्रमोशनपुरता तुझा संबंध नव्हता, तर त्याही पलीकडे ऋणानुबंध होते. तुला स्वतःचे मार्केटिंग करता आले असते तर तू यांच्यातील अनेकांशी अखेरच्या क्षणापर्यंत संपर्कात राहिला असता. पण, फकिरी वाट्याला आली आणि ती तू आनंदाने स्वीकारली. झोपडीत राहून कोण पुसणार होते तुझ्या वैभवाला? तरीही तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी घेतली होती तुझी दखल. राज्य शासनाच्या चित्रपट महोत्सवात जितेंद्रच्या हस्ते तुझा सत्कार झाला. पंचशील टॉकीजमधील तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. पत्रकार म्हणून डोळ्यात पाणी येण्याचे क्षण जवळपास नाहीच येत वाट्याला. पण, त्या दिवशी आले. सत्कारासाठी तुझा पंचशीलच्या स्टेजवर आमंत्रित केले तेव्हा अंधारात जितेंद्रचे लक्ष गेले नाही. आणि जसा तू पायऱ्या चढून वर आला तसे जितेंद्र जागेवरून उठले आणि "सरदार?” हा एकच प्रश्नांकित शब्द त्यांनी उच्चारला आणि तुला कडाडून मिठी मारली. हा प्रसंग लिहीतानाही कंठ दाटून येतो सरदार. कुण्या मोठ्या नटाचे निधन झाले की मी तुला फोन करायचो आणि तू कोरिओग्राफर, सिनेमॅटोग्राफर पासून मेक-अपमन पर्यंत प्रत्येकाची नावे सांगायचा. तुला आज खरं सांगतो... तू अशी डिटेल माहिती दिली, की मी अॉफिसला येऊन गुगलवरून त्याची खात्री करून घ्यायचो. माझा तुझ्यावर विश्वास होता, तरीही. प्राण यांच्या एका नातेवाईकाचे धरमपेठमध्ये चपलेचे दुकान होते, अमजद खान यांच्या आईचे निधन झाल्यामुळे राजेश खन्ना यांच्या चित्रपटाचे नागपुरातील चित्रीकरण रद्द झाले... हे सारे तूच सांगायचास आणि तेही ठामपणे. देशभरात फ्लॉप गेलेले चित्रपट दिग्गज निर्मात्यांनी नागपुरात वाजवून घेतले आहेत, ते तुझ्या प्रमोशनच्या स्टाईलमुळे. आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन चित्रपटांचे प्रमोशन होते, तू पूर्वी स्वतःच सायकलने सर्व वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमध्ये जाऊन पत्रकार परिषदेचे निमंत्रण द्यायचास. पत्रकारितेच्या क्षेत्रातील लक्ष्मणराव जोशी सर (Laxman Joshi), विजय पणशीकर सर, प्रकाश दुबे सर यांची नावे कायम तुझ्या ओठावर असायची. छायाचित्रकार शेखर सोनी यांच्याबाबत तू सतत विचारायचास. एकदा पंचशील सिनेमागृहाच्या बाहेर तू माझा हात घट्ट पकडला आणि "बीस रुपये है क्या?” असे विचारले. मी 30 रुपये दिले, तर तू त्यातील दहा परत केले. मला गंमत वाटली. वाटलं काही काम असेल आणि सुटे नसतील. पण, दुसऱ्या दिवशी कळले की तुझ्याकडे खरच पैसे नव्हते आणि लुनामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तुला हवे होते. नंतर काही दिवसांनी कळले, की तू एका मॅगझीनला चित्रपटांचा किती व्यवसाय झाला, याचे रिपोर्टींग करतो आणि तुला दर सहा महिन्यांनी त्याचे मानधन मिळते. तेव्हाही तू एेंशीच्या घरात होतास. पण एका संस्थेला पुरस्कारासाठी तुझे नाव सुचवले तेव्हा "कॅश नही होना, बहुत कमा लिया" असे आयोजकाला सांगणारा मोहनसिंग मी बघितला आहे. "झुंड"च्या शुटींगसाठी अमिताभ नागपुरात होते, तेव्हाही तुला म्हटले होते भेटण्याबाबत. पण, तू म्हणाला "भिड में नही जा सकता मै". अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल. डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि डॉ. सुनिती देव (Suniti Deo) यांनी एकदा मला या अनुभवाचे काय करायचे हे सांगितले होते. त्यालाही पाच वर्षे झाली. तू जिवंत असताना ते झाले असते, तर आनंद झाला असता. तुझे मेहाडिया चौकातील कार्यालय, पंचशीलचे व्यवस्थापक राजा लहेरिया यांच्यामुळे झालेली आपली भेट, त्याठिकाणी महेश (Mahesh Tickley Photojournalist) आणि मी केलेले एक शुटींग, तुझ्या मुलीचे आणि त्या पाठोपाठ बहिणीचे निधन... वगैरे वगैरे. तुझ्या झोपडीच्या छतातून सतत कचरा पडायचा आणि तरीही ताईने बनवलेले पराठे मी व महेश त्या धुळीसकट आनंदाने खात होतो. खूप आहे रे माझ्याकडे. पण, "मेल्यावर माणसाची किंमत होते" हा नियम मोडायचा नसतो. तुझी-माझी शेवटची भेट किती ह्रदय पिळवटून टाकणारी होती, याचा संदीप (Sandeep Soni) सोनी साक्षीदार आहे. त्या भेटीचे वर्णन लिहीताना माझी बोटं अडखळत आहेत. त्यासाठी वेगळे निमित्त शोधेन. तुर्तास एवढेच.

श्रद्धांजली वाहणार नाही... मी तुला जिवंत ठेवणार आहे !

तुझा,

नितीन

(Not original, copied from WhatsApp)

Tuesday 24 September 2019

राईट टू सर्व्हिस अॅक्ट म्हणजेच सेवा हमी कायदा महाराष्ट्रात लागू

राईट टू सर्व्हिस अॅक्ट म्हणजेच सेवा हमी कायदा महाराष्ट्रात लागू


महाराष्ट्रात आजपासून 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43  सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.
तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.

महाराष्ट्र सरकारची वेबसाईट

www.aaplesarkar.maharashtra.gov.in

वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.

या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.
या सेवांचा आहे समावेश....

• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
• मिळकतीचे प्रमाणपत्र
• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
• पत दाखला
• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
• भूमिहीन प्रमाणपत्र
• शेतकरी असल्याचा दाखला
• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
• जन्म नोंद दाखला
• मृत्यु नोंद दाखला
• विवाह नोंदणी दाखला
• रहिवाशी प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
• हयातीचा दाखला
• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
• निराधार असल्याचा दाखला
• शौचालयाचा दाखला
• विधवा असल्याचा दाखला
• दुकाने आणि अस्थापना नोंदणी
• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
• सेवानियोजकाची नोंदणी
• शोध उपलब्ध करणे
• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड
'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.

सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.


Thursday 19 September 2019

नवीन नाटय निर्मिती अनुदान नियमावलीत बदल


मुंबई, दि. १९ सप्टेंबर : राज्य शासनामार्फत नवीन नाटय निर्मिती करणाऱ्या संस्थांना नाटय प्रयोग सादरीकरणासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेत यापूर्वी व्यावसायिक व संगीत नाटकांसाठी राज्यातील सहा महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक होते, आता नवीन नियमानुसार सहा महसूली विभाग ऐवजी चार महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक आहे, अशी सुधारणा करण्यात आली आहे.
        तसेच प्रायोगिक नाटकांनाही जास्तीत जास्त अनुदान मिळावे यासाठीचे नियम सुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. प्रायोगिक नाटकांना अनुदान मिळण्यासाठी असणारा जो पहिला १० चा टप्पा होता तो आता कमी करण्यात आला असून पहिल्याच टप्प्यात ५ प्रयोगांचे अनुदान घेता येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात सहा महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग करण्याची अट आता शिथिल करण्यात आली असून आता फक्त दोन महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग सादर करावयाचा आहे. तसेच नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी आवश्यक असणारी पोलीस परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. नाट्यप्रयोग सादरीकरणाचा यापूर्वी नसलेला कालावधी या नियमावलीत निश्चित करण्यात आला आहे.
        सदरची योजना ही सन २००६ पासून सुरू करण्यात आली आहे. अनेक जुन्या नाटय निर्मात्यांबरोबर नवीन नाटय निर्मातेही या योजनेचा लाभ घेत असतात. परंतु, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नाट्यगृह नसल्याने ज्या महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यगृह नाहीत, त्या जिल्ह्यात नाट्यप्रयोग करणे शक्य नसल्याने, ही अट शिथिल करण्याची विनंती नाटय निर्मात्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांना केली. त्याची दखल घेत सदरच्या योजनेतील काही अटी आता शिथिल करण्यात आल्या असून, यामुळे नाटय निर्मात्यांना ज्या जिल्ह्यात सुस्थितीत नाट्यगृह आहे अशा महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यप्रयोग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
      व्यावसायिक निर्मात्यांबरोबर प्रायोगिक रंगकर्मींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच यामुळे जास्तीत नाटय नाट्यनिर्मिती होऊन नाटय रसिकांना दर्जेदार नाटकं पाहता येणार आहे.
    नाटय क्षेत्रातील नाटय निर्मात्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

दलित शब्द हा व्यवहारात असायलाच हवा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


दलित शब्द हा  व्यवहारात असायलाच हवा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 19 -  शासकीय नोंदीमध्ये जातीचा उल्लेख करताना दलित हा शब्द यापूर्वीही वापरला जात नव्हता त्यामुळे शासकीय नोंदीमध्ये दलित शब्दाला मनाई ठीक आहे मात्र  व्यवहारात तसेच प्रसार माध्यमांमध्ये  दलित शब्दाला मनाई करता कामा नये. दलित शब्दच शेकडो वर्षांपासून आलेल्या सामाजिक विषमतेच्या वेदनेला नेमकेपणाने प्रकट करतो. त्यामुळेच भारतीय दलित पँथर या संघटनेची आम्ही स्थापना केली होती. माझ्या मते दलित शब्द व्यवहारात असायलाच हवा असे प्रतिपादन  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने सरकारी कागदपत्रांतून दलित शब्द वापरण्यास  मनाई करणारा आदेश नुकताच काढला आहे. याबाबत ना.रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना व्यवहारात दलित शब्द असायलाच हवा अशी भूमिका मांडली आहे. बोलण्यामध्ये भाषणांमध्ये वृत्तपत्र मीडिया माध्यमांमध्ये दलित शब्द वापरण्यास मनाई करणे योग्य ठरणार  नाही. त्यामुळे व्यवहारात दलित शब्द असायलाच हवा सरकारी दस्तऐवजांमध्ये यापूर्वीपासून अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग केला जात असल्याचे सांगत व्यवहारात  दलित शब्दाला मनाई नसावी असे स्पष्ट मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

#RAMDASATHAWAL
#Dalit
#रामदासआठवले
             

Wednesday 18 September 2019

मुंबई विद्यापीठात कॉल सेंटर सरू होणार


मुबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांची वाढती संख्या, प्रवेश, परीक्षा तसेच निकाला दरम्यान विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत विद्यार्थ्यांचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठात तात्काळ कॉल सेंटर सुरू करण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांना दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाचा विस्तार सावंतवाडी, रत्नागिरी, रायगड, पनवेल, मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर ते डहाणूपर्यंत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या ही सुमारे ७८० घरात पोहचली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त आहे.  यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी दूरवरुन महाविद्यालय गाठावे लागते. परीक्षेचा अर्ज भरताना, निकालावेळी अथवा छोटया छोटया कामांसाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात अथवा उपकेंद्रात सातत्याने जावे लागते. एक-दोन वेळा जाऊनही विद्यार्थ्यांचे काम होत नाहीत. शहरीबरोबरच ग्रामिण भागांतील विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊनच तसेच बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन विद्यार्थ्यांची होणारी परवड तसेच पैशाचा पडणार भुर्दंड दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अद्ययावत कॉल सेंटर सुरू करावे, असा अतारांकीत प्रश्‍न जुलै २०१९ च्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सदस्यांनी उपस्थित केला होता.

या प्रश्‍नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाचे मोबाईल ऍप कार्यरत असून अद्ययावत कॉल सेंटर सुरू करण्याबाबत विद्यापीठ स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे, छापील उत्तर देण्यात आले. बदलत्या काळानुसार अन्य विद्यापीठांच्या स्पर्धेत आपले विद्यापीठ भविष्यातही कुठेही मागे राहू नये विद्यापीठाचे स्वत:चे कॉल सेंटर असणे ही बाबा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असल्याचे, राज्यमंत्री यांनी पत्रात नमुद केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी विद्यापीठातकिंवा उपकेंद्रावर न जाता सर्व आवश्यक माहिती प्राप्त होईल. यासाठी विद्यापीठाने तात्काळ कॉल सेंटर सुरू करावे, असे निर्देश राज्यमंत्री वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी पत्राद्वारे दिले आहेत.