Sunday 14 May 2017

INTERVIEW - AYUSHMANN KHURRANA



यश हे गरीब शिक्षकाप्रमाणे असते - आयुष्यमान खुराना

-    हर्षदा वेदपाठक

प्रशिक्षीत गायक असलेला आयुष्यमान खुराना, मेरी प्यारी बिंदु या चित्रपटात गाण्याची फारशी समज नसलेल्या तरुणाच्या भुमिकेत दिसुन येतोय. गायक, आर.जे., अभिनेता, लेखक अश्या चारही क्षेत्रात नाव कमावलेल्या या कालाकारबरोबर केलेली चर्चा...

मेरी प्यारी बिंदु या चित्रपटात तु साधारण इसम आहेस तर परिणीती गायकाच्या भुमिकेत आहे. मुळात तु एक प्रशिक्षीत गायक असताना, तुला त्या भुमिकेसाठी किती मेहनत करावी लागली.

बरयापैकी. खासकरुन मी गायक असताना मला बेसुरात गायचे होते. ते कोणत्याही गायकासाठी खुप कठीणच काम आहे.

आपल्याकडे हिरोची व्याख्या फार वेगळी आहे?

क्रिकेटपटू आणि अभिनेते हेच आपल्यासाठी हिरो असतात.. आपल्या देशाची संस्कृतीच अशी आहे... तुम्हाला जर पर्याय दिला तर तुम्हाला नेहमीच शहारुख खानला बघायला आवडेल आणि हे सगळे तो किती मोठा स्टार आहे यावर अवलंबून असते. ही एक प्रकारची प्रभावश्रेणी आहे आणि ती बरोबर आहे की चूक ते मी सांगू शकत नाही.  

लेखक म्हणून तू सध्या काय करत आहेस?

डीएनए या वृत्तपत्रासाठी मी एक सदर लिहीत आहे आणि त्याचबरोबर काही गाणी आणि नाटकांच्या पटकथाही लिहीत आहे. काही वेळा लेखकाला एका विशिष्ट अडचणीचा सामना करावा लागतो...रायटर ब्लॉक ज्याला आपण म्हणतो... त्यामुळे तो पुढे काही लिहूच शकत नाही. ती त्याची विचार प्रक्रीया असते. लेखक हा काही पठडीबद्ध हीरो नसतो. त्याची अंतःप्रेरणा त्याच्यासाठी महत्वाची असते.

लेखकाची स्वतःची भाषा असते आणि त्याच्यासाठी काय शक्य आहे, असे तुला वाटते?

एक लेखक गीत लिहितो, काव्य करतो आणि काही लेखक हे कादंबरीकारसुद्धा असतात. सलीम-जावेद यांनी पटकथा लिहिल्या. प्रत्येक लेखकाची स्वतःची शैली असते. लेखन हे एक प्रकारे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती वाढविणारे असते. तो त्याच्या व्यक्तिमत्वाचाच विस्तार असतो.  

तुला कधी पटकथा लिहिण्याची इच्छा झाली का?

मी सत्य घटनांबाबत बरेच लिहीतो. तर बऱ्याचदा मी कथा-कादंबऱ्या किंवा काल्पनिक गोष्टी वाचत असतो, पण मी कधीच पटकथा लिहीण्याचा विचार केलेला नाही.

तुझ्या कारकिर्दीत यशराज बॅनर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीला ना?

मला या गोष्टीचा खरंच खूप आनंद आहे की मी दम लगा के हईशाया चित्रपटात काम केले. विकी डोनर हा चित्रपट केल्यानंतर मी तो स्विकारला होता. हा एक लहान चित्रपट होता आणि त्यामुळे आदित्य चोप्राला खूपच आश्चर्य वाटले. मी मात्र त्या चित्रपटाबाबत खूपच उत्साहीत होतो. त्यानंतर बेवकूफीयां आला. माझ्या पाचपैकी दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्या अर्थाने मी खूपच सुदैवी आहे. मला वाटते यश हे एक गरीब शिक्षक असते, तर अपयश मात्र तुम्हाला खूप अधिक शिकवून जाते. ते तुम्हाला जमीनीवर ठेवते.

एखादा ऍक्शन चित्रपट करण्याचा विचार आहे का?

भूमिका आणि त्याबाबतचे व्यक्तिचित्रण यातूनच माझा विस्तार होतो. मला एखादा ऍक्शन चित्रपट करण्याची इच्छा आहे,, पण ते योग्य वेळी होईल.

तु गातोस, अभिनय करतोस, लेखन देखिल करतोस. तुला मिळणारे आत्मिक समाधान कश्यामध्ये आहे?

तुम्ही जर का हुशार आहेत, तर ते तुम्ही निवडलेल्या सगळ्याच बाबतित सुपिकता देणे गरजेचे असते. तुम्हाला मल्टीटॅलेन्टेड असणे गरजेचे नाही. जर मला एकापेक्षा अधिक कलेमध्ये समाधान मिळत असेल तर मी त्या सगळ्या गोष्टी मन लावुन कराव्यात या विचारसरणीचा मी आहे.

चांगला निर्माता मिळणे कितपत महत्वाचे असते?

जर चांगला निर्माता पाठीशी असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. तश्या मोठ्या सेटअपचा भाग असल्याचा मला आनंद असतो. चांगला चित्रपट तयार करणे, तो प्रेक्षकांपर्यत पोहोचवणे हे सगळ्या गोष्टींचे एकत्र मिश्रण आहे. पण कठोर मेहनतीला मात्र पर्याय नसतो. त्यातूनच यश मिळत राहते.

परिणीती चोप्राबद्दल काय सांगशील?

मी चंदीगढचा आहे आणि ती अंबालाची.... आम्ही दोघेही पंजाबी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे आम्हाला घरातून मिळालेली शिकवण किंवा आमचे एकूणच झालेले संगोपन खूपच मिळतेजुळते आहे. आम्ही खूप मोठी जॅम सेशन्स करायचो. माझी तिच्याबरोबर चांगली मैत्री झाली. जेंव्हा आम्ही कोलकत्यात चित्रिकरण करत होतो, तेंव्हा आम्हाला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत गाडीने प्रवास करावा लागत असे. त्यावेळी आम्ही गाडीमधील गाणी ऐकत असू आणि तिला गाण्याची खूपच आवड आहे तेव्हा ती पिया तोसे... वर काम करत होती. मला रेडीओची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे तिची जुन्या गाण्यांची आवड माझ्या लक्षात आली. ती एकच अशी सहकलाकार आहे जिच्याबरोबर मी संगीत या विषयावर चर्चा करु शकलो.

एक अभिनेता म्हणून स्वतःबद्दल किंवा तुझ्या कारकिर्दीबद्दल काय सांगशील?

मी खूपच वास्तववादी आहे आणि खूप आशावादीही नाही. तसेच मला माझ्या मर्यादाही माहित आहेत आणि त्याचबरोबर मी किती स्वतःला सिद्ध करु शकतो तेदेखील माहिती आहे. एक अभिनेता म्हणून तुम्हाला तुमच्या मर्यादा ओलांडण्याची इच्छा असते. यामध्ये कुटुंबाचा पाठींबा महत्वाचा असतोच, पण काही वेळा तुम्हाला स्वतःला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावे लागते आणि स्वतःला सिद्ध करावे लागते. पण माझ्यासाठी मात्र माझ्या कुटुंबानेच मला अभिनयात ढकलले. मी नेहमीच एक सकारात्मक व्यक्ती आहे आणि आणि मी स्वतःवर खूप दबावही टाकत नाही. सुदैवाने ज्या भूमिका माझ्याकडे आल्या, त्या मला मिळाल्या. त्याचे श्रेय मी माझ्या क्षमतेला देईन.   

तू चित्रपटांबद्दल काय मापदंड ठरविले आहेस?

मी एक गायक अभिनेता म्हणून माझे सर्वोत्तम काम देईन, असा मापदंड मी निश्चित केला होता. आता परिणीती ही एक गायिक अभिनेत्री आहे. मला वाटते की काही प्रमाणात मी ते साध्य केले आहे. मी करत असलेल्या पद्धतीच्या चित्रपटांच्या मदतीने स्वतःचे स्थान निर्माण करायचे आहे, मग तो बरेली की बर्फी असू दे किंवा शुभ मंगल सावधान... मला खूप संध्या मिळालेल्या नाहीत तरी मला आशा आहे की, मी एक गायक अभिनेता म्हणून ओळखला जाईन.

कोलकत्यात काम करण्याचा अनुभव कसा होता?

मला कोलकत्ता खूपच आवडले. मला खाण्याची आवड आहे, माझ्या मेटॅबोलिझमची (वाढते वजन किंवा वजन) मला काळजी करावी लागत नाही. त्यामुळे मी तेथील खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद घेतला.

सोशल मिडीयामध्ये कलाकारांवर मर्यादा असतात काय?

आम्ही लोकांच्या नजरेत असतो आणि त्यामुळेच आम्ही काय बोलतो याची काळजी घेणे गरजेचे असते. ते अगदी कोरया कॅनवास प्रमाणे आहे. शहानिशा केल्याशिवया उगाचच काहीबाही बोलणे टाळणे गरजेचे असते. I


No comments:

Post a Comment