Wednesday 21 August 2019

John Abraham on Batla House


जॉन आब्राहम - वास्तवदर्शी विषयाचे दास्ताऐवजीकरण व्हायला पाहिजे
- हर्षदा वेदपाठक

विकी डोनर, परमाणु, मद्रास कॅफे या चित्रपटांनतर जॉन अब्राहम निर्माता म्हणून  बाटला हाऊस या चित्रपटासह तयार आहे. दिल्ली हायकोतर्टाने बंदी उठवल्यानंतर, उदया तो चित्रपट भारतभर प्रदर्शित होत आहे. यासह जॉन बरोबर केलेली बातचित,

दिल्ली हायकोर्टाने बाटला हाऊस वरील बंदी उठवली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाला काय सांगशिल त्याबद्दल?

बाटला हाऊसमध्ये आरोपी असलेल्या दोन गुन्हेगारांनी, या चित्रपटावर बंदी आणावी यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु, आम्ही या चित्रपटाची कथा हि सार्वजनिक असलेल्या माहितीवर आधारीत असल्याचे पुरावे दिले. त्यात कोणत्याही घटनेला खोटे दाखवले गेले नाही, किंवा कोणत्याही घटनेचे उदात्तीकरण केलेले ऩसल्याचे आम्ही सिध्द केले. त्याखेरीज लहान मुले बॉम्ब तयार करत आहेत, तिच मुले कुराणचा वास्ता देत चर्चा करत राहतात या दोन दृष्यांना आम्ही टोन डाऊन केलं आहे. कोर्टाने, सोमवारी चित्रपट पाहिला आणि मंगळवारी त्यावर दिवसभर चर्चा करुन काल प्रदर्शित करायची ऑर्डर काढली. आता बाटला हाऊस, ठरवलेल्या तारखेनुसार प्रदर्शित होत आहे. 

बाटला हाऊस सारख्या वास्तववादी भुमिकांसाठी जेंव्हा दिग्दर्शकांकडून विचारणा होते, तेंव्हा नेमकं कसं वाटतं?

नक्कीच चांगलं वाटतं. काही असे विशिष्ट कलाकार आहेत, ज्यांचं त्यांच्या देशावर प्रेम आहे आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरुन आणि देहबोलीतूनही दिसून येतं. माझं माझ्या देशावर असलेलं प्रेम अगदी स्पष्ट आहे आणि मुख्य म्हणजे संजीव कुमार यादव या व्यक्तिरेखेसाठी माझी शरिरयष्टी अगदी चपखल आहे. निखिलने मला ही पटकथा एकदा तरी वाचून पहाच, असा आग्रह केला आणि जेंव्हा मी ती वाचली तेंव्हा मी थक्क झालो. सत्य हे कल्पनेपेक्षाही चमत्कारीत असते. मला सुरुवातीला वाटलं की हे काल्पनिक आहे, पण त्यातील प्रत्येक गोष्ट खरी आहे. आणि त्या चित्रपटाची निर्मीती देखिल केली.

घटना आणि भुमिका दोन्ही वास्तवदर्शी आहेत. कश्याप्रकारे भुमिकेची तयारी केली?

तुम्ही जेव्हा वास्तविक पात्र साकारत असता, तेंव्हा तुम्ही सर्जनशील स्वातंत्र्य घेऊ शकता, पण त्यासाठी  मर्यादा निश्चित करणे आवश्यक असते. आणि मी संजीव कुमार यादव यांच्याबरोबर ऐक दिवस घालवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी मी त्यांच्याबरोबर सहा तास होतो आणि त्या दरम्यान त्यांच्या मनात काय सुरु आहे याची अंतर्गत प्रक्रिया समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. बंदूक वापरायला शिकलो. बाबरी मशीद प्रकरणानंतरचे हे वादग्रस्त प्रकरण होते आणि हा विषय आम्ही कसा हातळणार आहोत, हे खूपच महत्वाचे होते. त्यांना पीपीएसटी पोस्ट ट्रॉमॅटीक समस्या होती. त्यांची पत्नी त्यांना सोडून जाऊ इच्छित होती आणि त्याचबरोबर काही कौटुंबिक समस्याही होत्या. त्यांना आत्महत्या करावीशी वाटत होती आणि भारत सरकारकडून त्यांची चौकशी सुरु होती. (आतापर्यंत)त्यांनी नऊ शौर्य पुरस्कार मिळवले आहेत. घटनेपुर्व त्यांना(यापैकी) सहा शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. या सगळ्या गोष्टींचे संतुलन राखणे आवश्यक होते आणि आम्ही बरयापैकी तसा प्रयत्न केला आहे.


निखिलला आणि तुला बाटला हाऊस हा विषय का आकर्षक वाटला?

निखील अडवाणी दिग्दर्शित डी-डे हा चित्रपट मला खुप आवडला होता. मात्र बाटला हाऊस हा चित्रपट त्याच  दृष्टीकोणातून बनवता येणार नाही, यावर आमचं दोघांचं एकमत होतं. पिडीतांचा दृष्टीकोन, दहशतवाद्यांचा दृष्टीकोन आणि आम्ही त्यांची कशी व्याख्या करतो ते, दिल्ली पोलिस, साक्षीदारांचा दृष्टीकोन आणि चौथा न्यायालयाचा दृष्टीकोन... हे सगळे ऍंगल आणि चर्चा महत्वाची होती. आहे. आणि मला वाटतं प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल.   

अरिझ खानचे काय?

या प्रकरणावर सध्या न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. त्यामुळे मला त्यावर भाष्य करण्याची परवानगी नाही. बाटला हाऊस ही एका वास्तव घटनेपासून प्रेरीत अशी काल्पनिक कथा आहे. तसा आम्ही डिस्क्लेमरही दिला आहे. आमच्याकडे सीबीएफसीचे यु/ए प्रमाणपत्र आहे, त्यामुळे या विषयावरील मत मी राखून ठेवले आहे.

बाटला हाऊस हा विषय वादातीत आहे. त्यावर चित्रपट तयार करताना भिती नाही वाटली तुला ?

चित्रपटात सगळ्या दृष्टीकोनांतून भाष्य करण्यात आले आहे आणि आम्ही ते प्रेक्षकांवर सोपवले आहे. कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून तुम्हाला तुमचे राजकीय पक्षपात बाजूला ठेवावे लागतात आणि प्रेक्षकांसमोर निःपक्षपाती दृष्टीकोन मांडावा लागतो. आणि आम्ही ते काम केलं आहे.

सत्यघटनांचे दस्तऐवजीकरण आपल्याकडे फारसे होत नाही. त्यामुळे की काय वास्तवदर्शी चित्रपट ही आपल्याकडे फारसे होत नाहीत?

कोणालातरी ते काम करावे लागणारच. आणि ते मी परमाणुच्या वेळी केले. मद्रास कॅफे या चित्रपटाच्या शेवटी पण तसेच झाले. चित्रपट पाहून लोकं म्हणाले की तो ऑफीसर शेवटी मारला गेला आणि जॉन अब्राहमने त्याला वाचवले नाही. देशाच्या तरुणाईला राजीव गांधींच्या हत्येविषयी माहिती नाही. पन्नास तरुणांपैकी एक जण फक्त म्हणाला की तो चित्रपट राजीव गांधींशी संबंधित आहे. ही देशाची आजची परिस्थिती आहे. जेएफकेकडे पाहिलं तर समजतं की विदेशी लोकांनी  कशाप्रकारे सत्यघटनांचे दस्तऐवजीकरण केले आहे. पण त्याचबरोबर ते अतिशय रंजकही बनवलं आहे. कोणीतरी अशा गोष्टी सांगितल्याच पाहिजेत आणि मी ते करत असल्याचा मला आनंद आहे.

निर्मात्याच्या भूमिकेत शिरावं असं का वाटलं ?

मी निर्माता झालो कारण एक अभिनेता म्हणून मला माझ्या आवडीचे चित्रपट करायला मिळत नव्हते. निर्माता झाल्यावर एक अभिनेता म्हणूनही माझ्यात सुधारणा झाली. कोणीतरी आजचा, वेगळा विषय असलेला सिनेमा करायला हवा. विक्की डोनरने बधाई हो बधाई, शुभमंगल सावधान, उरी, आर्टीकल 15, खानदानी शफाखाना या सारख्या चित्रपटांना जन्म दिला. तुम्ही ट्रेंड सेटर असायला हवं असं मला वाटते आणि मला काही तरी वेगळं करायचं होतं.

व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट तयार करताना तुम्हाला तडजोड करणं भाग असतं का?

मला तरी तडजोड करावी लागते, कारण मी छोट्या बजेटचे चित्रपट करत असतो. माझ्याकडे मोठ्या आणि आलिशान सेटस् ची चैन नाही. बाटला हाऊस करत असताना सेटलाईट हक्क, संगीत, डीजीटल यासह चित्रपटाचा बाकी खर्च वगळून आम्ही चित्रपट भारतभर प्रदर्शित करु शकलो. शंभरापैकी, पन्नास रुपये वितरकाकडे जातात. वितरण साखळीत प्रत्येक जण सुरक्षित आहे. मुख्य म्हणजे, एक चांगले कथानक तुम्हाला सर्वोत्तम प्रकारे सांगण्यासाठी मी माझ्या डोक्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो.

तुझ्या चित्रपटातील नायिकांच्या निवडीबाबत काय सांगशील?

तेमी दिग्दर्शकांवर सोपवतो. परमाणुमध्ये माझ्याबरोबर अनुजा साठे आणि मृणाल पांडे होत्या. दोघीही अतिशय उत्कृष्ठ आणि शिस्तशीर अभिनेत्री होत्या. मी त्याबाबत कुठलाही निर्णय घेत नाही. अगदी नोहा फतेहीला एका गाण्यासाठी घेण्यात आल्याचंही मला माहित नव्हतं. अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामधिल केमस्ट्री चांगली असली पाहीजे, पण याबाबतचा निर्णय माझा नसतो. तो दिग्दर्शकाचा निर्णय असतो.

तुझी अक्षयबरोबर तुलना केली जाते, त्यावर काय सांगशील?

आमची मानसिकता मिळतीजुळती आहे आणि आम्हाला देशभक्तीपर चित्रपट करायला आवडतं. मला वाटतं, जर पटकथा चांगली असेल, तर तुम्ही असे चित्रपट करावेत. अक्षय चांगले चित्रपट करत आहे आणि मी मला करावेसे वाटतात ते चित्रपट करतोय, जे खूपच छान आहे. ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही असे चित्रपट करु शकत नाही जे देशभक्तीपर आहेत पण आशयघन नाहीत, असे चित्रपट चालणार देखिल नाहीत. तुम्ही बघाल की काही मोठ्या बजेटचे चित्रपटही साफ आपटले आहेत. त्यामुळे आशय महत्वाचा आहे. मला देशभक्त व्हायला आवडेल पण मला राष्ट्रवादी बनायचे नाही. देशाच्या सद्गुणांमुळे देशभक्त देशावर प्रेम करेल. राष्ट्रवादी देशातील सगळ्यासाठीच देशावर प्रेम करेल. मला देशाबाबत चिकित्सक व्हायचं आहे, तरीही देशावर माझे प्रेम आहेच.

स्वातंत्र्यदिनाच्या काही आठवणी आहेत का?

लहान असताना मला ध्वज धरायची खूप इच्छा होती, पण त्यावेळी त्याची परवानगी नव्हती. पण मला आठवतं, त्यावेळी लवकर उठून झेंडावंदनाला मी जात असे. पण माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा भाग म्हणजे फुटबॉल खेळायला जाणे, कारण तो सुट्टीचा दिवस असायचा.

बाटला हाऊस या चित्रपटासाठी केलेल्या संशोधनाबद्दल काय सांगशील?

आमच्या लेखकाने यावर चार वर्षे संशोधन केलं आणि त्यानंतर मी निखिलला यामध्ये समतोल आणण्यास सांगितले. आम्ही ५१ दिवसांत या चित्रपटाचे चित्रिकरण पुर्ण केलं. मी ते पोलिस अधिकारी, त्यांची बायको आणि कुटुंबियांना भेटलो आहे. त्यांच्या पत्नीने मला सांगितले की, ते पाच मिनिटांपेक्षा जास्त बोलत नाहीत. आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं त्यांच्या पत्नीवर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या आयुष्याचं द्विभाजन झालं आहे. ते अतिशय गौरवशाली अधिकारी होतेत त्यादरम्यान त्यांच्यावर आरोप झाले, त्यामुळे या प्रकरणात आपला काय दोष, असं ते विचारयचे. सध्या ते दिल्ली पोलीस सेलचे डीसीपी आहेत. त्यांच्या जीवाला सतत धोका असून, त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांना अलीकडेच दुखापत झाली होती आणि ते घरी सुखरुप येतील का, याची आपल्याला खात्री वाटत नसल्याचं त्यांच्या पत्नी सांगतात. कोणीतरी या गोष्टीचं कौतुक केलं पाहीजे. त्यांची पत्नी एबीपी न्यूज चॅनेलसाठी काम करतात आणि त्यांच्या मुलांना या सगळ्यापासून दूर ठेवण्यात आलं असल्याची माहिती त्यांच्या पत्नीनं दिली.   

तुझ्या फीटनेसचे रहस्य काय आहे?

मी सिगरेट ओढत नाही, दारु पित नाही. तळलेल्या आणि गोड पदार्थांपासून दूर राहतो. लोक म्हणतात की, माझे टेस्ट बडस् मरुन जात आहेत. मला वाटतं जर तुम्हाला या आरोग्याला अपाय करणारया गोष्टी खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमचे मन कमकुवत आहे. यापैकी मला कोणी काही देऊ केलं तर मी त्यांना माझा शत्रू म्हणतो. त्यांना माझं चांगलं झालेलं नको आहे. जेंव्हा तुम्ही आजारी असता, तेंव्हा फक्त कुटुंबच तुमच्याजवळ येतं. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि तुम्ही स्वतःचे रक्षण करायला पाहीजे

आगामी चित्रपट कोणते आहेत?

मी मुंबई सागा सुरु करत आहे आणि नंतर मी ऍटॅक विथ लक्षची निर्मीती करतोय, जो ऍक्शन चित्रपट आहे आणि सत्यमेव जयते २ हा आणखी एक चित्रपट रांगेत आहे. मी सध्या माझ्या कामाचा पूर्वी कधीही घेतला नसेल एवढा आनंद घेत आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे. मी पुन्हा एकदा बॉबी ग्रेवाल आणि निखिल अडवाणीबरोबर काम करत आहे. आम्ही एकत्र सहा चित्रपट करत आहोत. माझ्या मते जेए एंटरटेंनमेंटमध्ये आम्ही असे चित्रपट करत आहोत जे करायला आम्हाला खरोखरच खूप आवडेल. मी पार्ट्यांना जात नाही आणि मी कुठल्याही कॅंपमध्येही नसतो आणि मला मित्रही नाहीत. मी माझे स्वतःचे काम करतो आणि मी बजेटशी तडजोड करत असलो, तरी मी ज्या कथा घेऊन येत आहे, त्याचा मला आनंद आहे. आमच्याबरोबर आता स्टुडीयो देखिल सहनिर्माता म्हणून काम करण्यास तयार आहेत.

पागलपंती हा चित्रपट सुध्द तु करत आहेस?

मला अनीस बज्मी हे दिग्दर्शक म्हणून खूप आवडतात आणि त्यांचे विनोदी चित्रपटही, हसवणे हि सगळ्यात अवघड शैली आहे. लोकांना हसवणं खूपच कठीण असतं. आम्ही नुकतंच त्याचं चित्रिकरण पूर्ण केलं आणि मला ते करताना खूप मजा आली.

उपराष्ट्रपतींनी बाटला हाऊस पाहिला तेव्हा त्यांची प्रतिक्रीया काय होती?

ते खूपच प्रभावित झाले आणि ते म्हणाले की मी तुमच्या दृष्टीकोनाचा आदर करतो.

- हर्षदा वेदपाठक

No comments:

Post a Comment